युवादिन आणि स्वामी विवेकानंद
12 जानेवारी हा “युवादिन” म्हणून साजरा केला जातो. हा स्वामी विवेकानंद स्वामीजींचा जन्मदिवस आहे. हाच का दिवस निवडला असेल बरे? त्याच्या मागे 150 वर्षापूर्वी स्वामीजींनी उभारलेल्या कार्याचा संकल्प पूर्ण करणे आजच्या युवकांच्या हाती आहे. त्यादिवशी त्यांची आठवण हीच एक युवकांसाठी क्रांतीकारी ठरू शकते.
“बंधू आणि भगिनींनो” या एका संबोधनाने स्वामीजींनी अमेरिकेतील सर्वधर्मपरिषद गाजविली. हिंदू धर्मांची तत्वे जसे की, सहिष्णूता, शांती, ऐक्य, बंधुभाव आणि शाश्वत ध्येय या सर्वांची ओळख जगाला पटविली. एक विराट जागृती आणि वैचारीक आंदोलनाची सुरुवात “उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती झाल्याविना थांबू नका” या संदेशाने झाली. भारताची आत्मशक्ती आणि राष्ट्रीय चेतनेला जागृत करुन क्रियाशील होण्यासाठी स्वामीजीनी सर्वांना प्रेरीत केले.
त्यांनी युवा शक्तीवर जास्त भर दिला होता. सेवा, स्वाध्याय, सुरक्षा आणि स्वावलंबन यामूळे सकस युवा पिढी तयार करून तिला अनेक आव्हाने पेलण्यासाठी तयार करणे हे मुख्य ध्येय त्यांच्यापूढे होते. आज 150 वर्षांनंतरही या मुल्यांची अत्यंत आवश्यकता आहे असे वाटते. असा हा मनस्वी आणि तेजस्वी युवक अल्पकाळ देशाला लाभला. परंतू स्वामीजींचे कार्य प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक टप्प्यावर दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन घडविते. आज आपण महासत्ता बनण्याचा प्रयत्न करत आहोत.
त्यासाठी लागणारे घटक, विचार-बांधणी आणि अंमलबजावणी 150 वर्षापूर्वीच या महान युवकाने सुरु केलेली होती. स्वामीजींची किती दुरदृष्टी होती हे यावरून दिसून येते.
सध्याचा युवक काय करतो? नश्वर सुखाच्या मागे लागतो. आधुनिक तंत्रज्ञान आणि बहूपर्यायातून योग्य पर्याय शोधण्यामध्ये वाया जाणारी युवा शक्ती व बोकाळलेला चंगळवाद. स्वामीजी चंगळवादाला विरोध आणि विज्ञानाची कास धरण्याबाबत विशेष आग्रही होते. सामाजिकरित्या समृध्द होण्यासाठी लागणारे संकल्प, शुचिता, सामर्थ्य आणि विश्वास आज कुठेतरी कमी पडतो असे वाटते. हे गाठण्यासाठी लागणारी प्रबळ प्रेरणा, सामुहीक इच्छाशक्ती आणि दृढनिश्चय हवा. आज आपल्या देशात युवकांची संख्या ही इतर देशाच्या तुलनेत जास्त आहे आणि तीच खरी देशाची मोठी संपत्ती आहे.
चला, आपणही एक संकल्प करूया “या कार्यात युवकांबरोबरच जेष्ठांनी सामिल होऊन आपआपला खारीचा वाटा उचलूया”.
Comments
Post a Comment