आम्ही सावित्रीच्या लेकी

               आज सावित्रीबाईंचा जन्मदिवस. शासकीय कार्यालयात नेहमी आम्ही गांधी, नेहरूंच्या बरोबरीने त्यांचा फोटो पाहतो तेव्हा आमचा ऊर अभिमानाने भरून येतो. त्यांनी रचलेल्या पायावर आजच्या स्त्रियांचे पाऊल अंतराळात झेपावले आहे. जगाच्या आकाशात महिलांचा झेंडा सर्वच क्षेत्रात उंचावत आहे ते शक्य झाले केवळ सावित्रीबाईंच्या योगदानामुळेच. स्वाभिमान आणि स्वत्व जपणे असे दुहेरी काम प्रत्येक स्त्रीला करावे लागते. मग ते घरात असो किंवा कामाच्या ठिकाणी. स्वत:बरोबरच इतरांना सांभाळून संसार व जीवन मार्गी लावणे हे प्रत्येक स्त्रीचे आद्यकर्तव्य ठरते.

             आज स्त्रिया स्व:कर्तृत्वाने आणि स्वाभिमानाने प्रसंगी साथ असू दे, नसू दे त्या स्वतः खंबीर भूमिका घेत आहेत. अनेक स्त्रिया आपल्या अवतीभवती आढळतात, ज्या सार्वत्रिक प्रश्न आणि पडणारे पेच हे प्रयत्नाने सोडविणा-या आहेत. त्या अंधारात चाचपडणाऱ्यांना आशेचा किरण दाखवतात, प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने लढतात. निवडलेल्या क्षेत्राशी बांधिलकी जपणारी, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनही सुसह्य करण्यासाठी धडपडणारी अशा स्त्रियांची ओळख आपल्याला वारंवार घडत असते.

              अशा या स्त्रीशक्तीचा साक्षात्कार आधी स्वत:ला आणि इतरांना करून देणे महत्वाचे. जोपर्यंत ती स्वतः खंबीर भूमिका घेत नाही नकाराधिकार वापरात नाही तोपर्यंत तिच्या अस्तित्वाची जाणीव दुसऱ्यांना होणे कठीण असते. आमची पिढी भाग्यवान, जी सक्षम आहे, त्याच बरोबरीने आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून जुन्या आणि नव्याची सांगड घालू शकते. संवादकौशल्याने समस्यांवर उपाय शोधून काढू शकते. स्वत:च्यामर्यादा आणि शक्तीचा योग्य ताळमेळ घालून उंच भरारी घेऊ शकते. हे सर्व शक्य झाले ते सावित्रीबाईंनी सन 1848 मधील घेतलेल्या पहिल्या पावलाने.   असे म्हणतात" सगळ्याच गोष्टी होतील उत्तम, जर प्रथम पाऊल असेल उत्तम". म्हणूनच सावित्रीबाईंना मानाचा पहिला मुजरा.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव