माझा धर्म कोणता?
तु हिंदू बनेगा या मुसलमान बनेगा. इन्सान की औलाद है इन्सान बनेगा.!
हे गाणे ऐकून नक्की आपला धर्म कोणता याचे उत्तर मिळते. तसे तर आपण भागवत धर्म,
महाराष्ट्र धर्म असे अनेक धर्म मानतो. सगळ्यात मोठा धर्म माणूसकीचा. माणसाने माणसाला माणसासारखे वागविणे म्हणजे माणूसकी होय. यातूनच सर्व धर्म समानता, सहिष्णुता आणि बंधुता या तत्वांचा अंगिकार आपल्या घटनेने स्विकारलेला आहे. म्हणूनच सगळ्यांचे लक्ष भारताकडे जास्त आकर्षित होते. इथे सर्व धर्म एकत्रित आणि गुण्यागोविंदाने रहातात व विविधतेतून एकता दाखवतात. प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असतो. प्रत्येक धर्माची भाषा रितीरिवाज चालीरिती परंपरा वेगवेगळ्या असतात आणि ज्यांनी त्यांनी त्या स्वेच्छेने पाळाव्यात
इतरांना बंधनकारक करू नयेत. ब-याच वेळा यावरून वादविवाद होतात पण ते तेवढ्यापुरतेच असावेत. त्याचा बागुलबुवा करणे टाळावा.
अर्जुनाला गीता सांगताना श्रीकृष्णाने सांगितले “तुझा धर्म युध्द करण्याचा आहे समोर नातेवाईक, गुरूजन असू दे, तू तुझा धर्म पाळ”. म्हणजे तू तुझे युध्द कर्तव्य कर. कुठल्याही कर्तव्य पालनात कुणीही कसूर केल्यास त्याचे परिणाम त्यालाच भोगावयास लागतात. योग्य वेळी योग्य कर्तव्य करणे हे माणसाचे आद्य शिक्षण ठरते. त्यासाठीच लहानपणीचे संस्कार आणि कर्तव्याची जाणीव असणे आवश्यक आहे.
देश सांभाळण्यासाठी सैंनिक स्वत:चा जीव पणाला लावतात. संत मंडळी/ समाजसुधारक प्रसंगी लोकांकडून दगडाचा मार खातात पण आपले कर्तव्य बजावतात. पोलिस, डॉक्टर व संशोधक हे सगळे या समाजधर्मामूळे प्रेरीत असतात. विशिष्ट वेळी मी कसे वागले पाहिजे हे मला जेव्हा कळेल तेव्हा माझा ख-या अर्थाने विकास झाला असे म्हणता येईल. आणखी एक म्हणजे “विश्व धर्म पाळणे” ही आजच्या काळाची गरज आहे.
Comments
Post a Comment