युध्द आणि प्रेम
दोन परस्पर विरोधी गोष्टी कशा शक्य असणार? असे वाटेल तुम्हाला! त्यातही काही समान गोष्टी आढळतील. जन्मापासून आंतरिक युध्द आपल्या पाचवीला पुजलेले आहे. बाळ जसे जसे मोठे होत जाते. तसे तसे त्याच्यावर अनेक मानसिक, शारिरीक युध्दाचे प्रसंग येतात. पुर्वीसारख्या ढाल-तलवारी नसल्यातरी वाग्बाण, शिव्या, टिका इत्यादी वाईट सवयी असतात. त्यासाठी आणि इतर अनेक गोष्टींसाठी संघर्ष अटळ असतो. जे माणसाचे तेच देशाचे हल्ली पुर्वीसारखी जमीनीवर युध्दे होत नाहीत. तर जैविक, रासायनिक, हवेत, पाण्यात युध्दे होत असतात. भांडणे व कुरापती काढण्याची शस्त्रे बदलली पण सवय गेलेली नाही. रामदास स्वामी उगीच म्हणून गेले नाही. “रात्रं- दिवस आम्हा युध्दाचा प्रसंग” कुणाला जगायचे कसे याचा तणाव तर कुणाला का जगायचे याचा तणाव. कुणी स्वत:चा जीव वाचवयाच्या धडपडीत तर कुणी दुस-यांचा जीव घेण्याचा गडबडीत. एकूण काय लढाई चालूच असते.
तीच गोष्ट प्रेमाची. आईच्या पोटातूनच प्रेम वात्सल्य, ओलावा घेऊन आलेला जीव आयुष्यभर त्याच्यासाठीच भूकेला असतो. कुणातही तो पहिल्यांदा प्रेम शोधत असतो. मग तो आपला असो की परका
प्राणी किंवा पक्षी. काही अनेक ध्येय वेडी माणसे, प्रेमासाठी त्यांची वाटेल ते करायची तयारी असते.
त्यासाठी प्रथम दुस-यांवर प्रेम करावे लागते. तेच प्रेम पुन्हा कोणत्याना कोणत्या रुपाने परत मिळत असते. एकमेकांना जिंकण्याची इच्छा सगळ्यांमध्येच असते पण काही जण जिंकतात तर काही जण हरतात. “To be or Not to be” हे द्वंद्व मनात नेहमीच चालू असते. अशा या द्वंद्वाचा आणि प्रेमाचा फायदा कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक व्यक्तिमत्व घडविण्यात होतो आणि तो आवश्यकच असतो. अशा या युध्दातूनच अनेकवेळा काही नवीन हाती लागते आणि माणसाची सत्व परिक्षा घडवून काहीतरी दिव्य भव्य कलाकृती तयार होऊ शकते.
Comments
Post a Comment