परिक्षेचा मोसम
दरवर्षी मार्च-एप्रिल महिना आला की परीक्षेचा मोसम सुरु होतो. विशेष
करुन १०वी, १२ वी आणि स्पर्धा परिक्षा या काळात होतात.
मग विद्यार्थ्यांवर दबाव, पालक-शिक्षक यांची धावपळ, तगमग, ताण
या गोष्टींवर भर देण्यात येतो. आता या सगळयांच्या पार आम्ही गेल्यामुळे
त्याचे काही वाटत नाही. परिक्षा द्यावयाची आणि घ्यावयाची दोन्हीं गोष्टींविषयी मला आवड आहे.
मी वयाच्या ५० पर्यन्त वेगवेगळ्या प्रकारच्या परिक्षा दिलेल्या आहेत.
स्पर्धा परिक्षांच्या सुपरव्हिजन करून मुलांचे परिक्षा देतानाचे वेगवेगळे
हावभाव टिपलेले आहेत. तेव्हा तेवढे लिखाण होत नव्हते, नाहीतर या विषयावर एक
निबंध लिहीला असता.
हल्ली परिक्षा आणि अभ्यास यांचे विळ्या-भोपळ्याचे नाते आहे की काय असे वाटायला लागते. मागच्या वर्षीपासून सगळेच बिघडले आहे. शाळा, शिक्षण आणि शिक्षक यासाठी एक वेगळा अर्थसंकल्प असावयास हवा असे वाटते. आर्थिक तरतूदीसाठी शैक्षणिक विभाग आहे तरी एक स्वायत्त मंडळ. ज्यांनी पुढील 5 वर्षात किती इंजिनियर आणि किती डॉक्टर लागणार आहेत? इतर घटकांसाठी (उद्योग, व्यवसाय, शेती आणि सरकारी खाते) किती रोजगार उपलब्ध होऊ शकणार? किती नवीन शिकाऊ उमेदवार तयार झाले पाहिजेत? कोणते पायाभूत शिक्षण देणे गरजेचे आहे? किती शाळा आणि कॉलेजची आवश्यकता आहे? कमी असतील तर कुठे भर घातली पाहिजे? यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील शिक्षणतज्ञ, पालक आणि विद्यार्थी यांचे प्रतिनिधी यांनी आपआपसात उपलब्ध आकडेवारीचा अभ्यासपूर्ण गरज आणि आवश्यकता यांचा मेळ घालून त्याप्रमाणे धोरण आखून राबविले पाहिजे. सामाजिक हित व देशाचे हित लक्षात ठेऊन हे धोरण कठोरपणे राबविणे. योग्य बुध्दिमत्ता योग्य ठिकाणी वापरली जाईल आणि त्याचा उपयोग अनेकांना होईल. सध्या काय होतेय एखादी क्रेझ आली की त्यात पालक व विद्यार्थी वाहून जातात ते मनापासून नसते. अर्थात काही तोटे आहेत ते वगळून काम केल्यास आणि शैक्षणिक दर्जा सुधारल्यास खूप काही शक्य होईल. फक्त त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. आताचे युवक परदेशात शिक्षणासाठी जातात तेच शिक्षण इथे उपलब्ध झाल्यास होणारा बुध्दीमतांचे स्थलांतर आणि बुध्दीचा -हास (Brain Drain) रोखण्यास मदत होईल. तसेच युवाशक्तीचे मृगजळाच्या मागे धावणे कमी होईल.
Comments
Post a Comment