पध्दत असते तशी
साधारण आपल्या आई-आजीच्या काळात “पध्दत असते तशी” म्हणायची पध्दत होती. ही पध्दत वंशपरंपरागत चालून आलेली असायची. कधी अंधविश्वास, तर कधी मोठ्यांनी सांगितले ना मग ऐकले पाहिजे या भावनेतून चालत आलेल्या असतात. या पध्दती मागची भावना, शास्त्रीय दृष्टिकोन एवढा सगळा विचार कोणी केला नसेल का?
हल्ली
सर्रास उलट विचारले जाते. काय होते? कशाला करायचे? मीच का म्हणून करायचे, विशेषत: सोवळे-ओवळे, स्वच्छता, वेळच्यावेळी कामे करणे, किंवा विशिष्ट शिस्तीत कामे करणे हे आता कालबाह्य होत चाललेले आहे. मग परंपरागत पध्दती कोण ऐकतात व पाळतात?
गावात जरा जास्तच ह्या गोष्टी मानल्या जातात. उदा. दारात शिंकू नये, घंटी बायकांनी वाजवायची नाही, बोटे मोडू नये, रात्रीची केस-नखे कापू नये, शनिवारी तेल आणू नये, अमुक वारी मासे खाऊ नये किंवा मासांहार करून देवळात जावू नये, नुस्ती साडी किंवा पर्स देऊ नये. रुमाल देऊ नये. याची यादी लांबवत जाईल. पण या पध्दतीची मूळ कारणे काय आहेत हे कोणी सांगू शकेल का?
कधी कधी मी पण निरुत्तर होते. काहीतरी अघटित घडणार असेल तर डावी पापणी फडफडणे आणि तिला सोने लागले की ती बंद होणे. पायाळू माणूस जमिनीतील पाणी व धन शोधू शकतो इ. दुध तापवयाच्या आधी तळाला थोडे पाणी घातले की दुध करपत नाही.
अन्नधान्य पूर्ण संपवू नये. आधीच आणून ठेवावे. काही पध्दती या हितकारक (आणीबाणीमध्ये) उपकारक ठरतात व कालांतराने तशी सवय होवून जाते
आणि आपण आपल्याबरोबर दुस-यांचेही भले व्हावे या हेतूने ते पुढच्या पिढीलापण पासऑन करीत असतो असे म्हटले तरी गैर काहीच नाही. पण उगीच वाद घालायचा म्हणून वाद घालत बसणारे काही जण असतात. दुर्लक्ष करणे आणि पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या असे म्हणावे लागते कधी-कधी.
काही सुशिक्षीत लोक या पध्दतींना खूप महत्व देतात. ज्यांना माहित नसेल त्यांना सांगाव्या पण लगेच अडाणी ठरवून मोकळ्या होतात. विशेषत: सासु-सुनांच्या बाबतीत यावरून अनेक वाद-विवाद होत असतात. चांगली असेल तर कोणतीही पध्दत शिकायला हरकत नाही.
नाहीच जमले तर त्याचा अट्टाहास नको इतकेच. प्रत्येक घराच्या वेगवेगळ्या पध्दती असतात. कार्यालयातसुद्धा वेगवेगळ्या
कामाच्या पद्धती असतात. परंतु त्यावरुन कोणी मोठे वा छोटे ठरत नसते. सोयीनुसार त्यात बदल करणे अपेक्षित असते, शेवटी काम होणे महत्वाचे.
Comments
Post a Comment