सध्या काय करते मिरांडा?

           अग, ऐकलंस का? 27 वर्षाच्या लग्नानंतर गिलगिटराव आणि मिरांडाबाई वेगळ्या झाल्या. हो त्यात काय नवल! आपली तर 54 वर्ष झाली, मी म्हणून तुम्हाला सांभाळून घेतलं हो, नाही तर दुसरी कधीच सोडून गेली असती. (अस्मादिकांनी लगेच हात धुवून घेतले).

           अग, तुझे वय 55 आणि लग्नाला 54 कशी होतील? अहो, पहिली गुलाबी 2 वर्ष सोडली तर आपली 27 वर्ष पुर्ण झाली आणि एक एक वर्ष 2 वर्षाप्रमाणे गेले म्हणून 54 वर्ष असा माझा हिशोब. हा आमचा सुखसंवाद भल्या सकाळी पार पाडला. बाकी काही म्हणा आपल्याकडे लग्नाची जोडपी 60-70 वर्ष नंतर सुध्दा गुण्यागोविंदाने रहातात हे या मिरांडा आणि गिलगिटरावांना कोण सांगणार?

              गंमतीचा भाव सोडा पण खरे वैवाहिक आयुष्य 27 वर्षानंतर सुरू होते, असे मला वाटते म्हणजेच वयाच्या आणि लग्नाच्या दोन्ही अर्थाने.  तो पर्यंत इतर जबाबदा-या नातेवाईक, मुले, नौकरी आणि घर इत्यादी मुळे स्वत:कडे व जोडीदाराकडे बघायला वेळच मिळत नाही. 27 वर्षानंतर मात्र हळूहळू स्थिर-स्थावर होण्यास सुरूवात होते. साधारणपणे वयाची पन्नाशी उलटलेली असल्यामूळे नैसर्गिक आणि परिस्थितीनुसार शहाणपणा आलेला असतो. ब-याच आघाड्यांवर लढून झालेले असते आणि तंबूत परत जावून इतरांना संधी देण्याची वेळ आलेली असते.

             तर अश्या आयुष्यातील या वळणार मिरांडाबाईंना किंवा गिलगिटरावांना का अशी बुध्दी झाली असावी?  आपल्या भारतीय लग्नाच्या तत्वज्ञानात, जरी कुणी सांगत नसले तरी ठराविक मुद्दे आपोआप गृहित धरले जातात. ते खालीलप्रमाणे

1) बाईला तडजोड करावी लागते.

2)  साप म्हणू नये धाकला, नवरा म्हणू नये आपला.

3)  परिस्थिती, संस्कार आणि राहणीमान  यामूळे कोणत्याही 2 व्यक्तींचे कायमचे पटणे शक्य नाही

4)  आज तडजोड केली तर उद्या फळे मिळतील.

5)   पदरात पडले, पवित्र झाले समजून आहे त्यातून मार्ग काढणे.

           आणखी ब-याच गोष्टी आहेत. आपल्या संस्कतीत लग्न ही आयुष्यातील एकदाच आणि कायमची घटना समजली जाते. दोन जीवांचे मीलन आणि मुख्यत: एकमेकाना समजून घेणे व  स्विकारणे  या महत्वाच्या बाबी वैवाहिक आयुष्य टिकण्यास मदत करतात. संततीचे भविष्य, आणि नातेवाईक या मुद्द्यांमूळे लग्न व्यवस्था टिकून रहाते. अपवादात्मक परिस्थितीत टोकाची भुमिका घेऊन काही जण विभक्त होतात. परंतू 90% संसार तडजोडीवर केले जातात. याची सवय दोघांनाही होते आणि लोणचे मुरल्यासारखे दोघेही एकमेकांना धरून रहातात. आई-वडील, मुले, नातेवाईक हे कालांतराने सोडून जाणार किंवा लांब जाणार हे गृहित धरल्यामूळे त्याचा म्हणावा तेवढा त्रास करून घेतला जात नाही. 

        आता पुढची पिढी मात्र काय करते, कशी वागेल ते बघायचे. आव्हांनाचे स्वरूप बदलले असले तरी आव्हानांचे समाधान त्यांना शोधावे लागणार आहे. आपण मात्र फक्त मार्गदर्शकाची भुमिका निभाऊ शकतो. बाय द वे, गिलगीटराव म्हणजे सरडा (वारंवार रंग बदलणारा). मिरांडा नावाचे शीतपेय प्रसिध्द आहे. मिरांडाबाई तुकारामाच्या आवलीसारखी तर नसेल ना? असो आपल्याला काय करायचे आहे. मात्र या गिलगिटराव आणि मिरांडाचा आदर्श आपल्या लोकांनी ठेऊ नये हीच अपेक्षा. मिरांडा सध्या काय करते? वेगळी स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करणार?, वलयांकित आयुष्य नाकारून नवीन आयुष्याची सुरूवात करणार कि या व्यतिरिक्त आणखी काही?     

        आपल्याकडचे बळवंतराव आणि मंगलाबाई खुष आहेत ना! झाले तर मग. गरज पडलीच तर मंगलाने योग्य वेळी वेगळे होण्यात शहाणपणा आहे. बळवंतरावांनीही “बायको ही बायको असते तिची जागा दुसरी घेऊ शकत नाही” या तत्वानुसार वागावे ही अपेक्षा. या नावात काही साधर्म्य असल्यास योगायोग समजावा.



Comments

  1. Dhanyawad, being first comment

    ReplyDelete
  2. विवाहिक जिवनाचे खरे सार आपल्या संस्कृती व संस्कार यातच दडले आहे...म्हणूनच संसार टिकवले जातात हेच मर्म अतिशय खुसखुशीत शब्दात सांगितलेस..Good job.

    ReplyDelete
  3. संसाराचे मर्म छान व्यक्त केले आहे, संसाराचा समानार्थी शब्दच तडजोड. सहज सोप्या भाषेत विचार मांडले आहेत. अशाच लिहीत रहा, खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  4. संसाराचे सार छान सांगितले आहेस.

    ReplyDelete
  5. संसारात तडजोड ही करावीच लागते बायको ही बायकोच असते मला तरी खूप पटतय

    ReplyDelete
  6. सुंदर. जोडीला अनुराधा चं गाणं पण यथार्थ आहे... असंच लिहिलं जा....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव