मुलगी शिकली प्रगती झाली

               एका रिक्शाच्या मागे लावलेले पोस्टर बघून खरं तर माझा मलाच अभिमान वाटला. आजची माझी तिसरी / चौथी  पिढी शिकलेली असली तरी अजुनही गावात मुलींना शिकविणे कमीच आहे.  आता लोकांना मुलीच्या शिक्षणाचे महत्व पटू लागले आहे. मुलींसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. प्रोत्साहन दिले जाते. त्याचेच फलित आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात चमक दाखऊ लागलेल्या आहेत. अगदी क्वचित जाणा-या क्षेत्रात जिथे पुरुषांची मक्तेदारी होती, तिथेही चंचुप्रवेश करून छाप पाडू लागलेल्या आहेत.  ही एक चांगली गोष्ट आहे.  परंतू त्याचबरोबर इतर आनुषंगिक समस्या निर्माण होऊ लागलेल्या आहेत. उदा. शालीनता, सौजन्य जे आधीच्या पिढीत आपसुकच पिढीजात येत असे त्याचे प्रमाण आता कमी होऊ लागले. “तडजोड कमी” आणि “हक्काचा अतिरेक” याचे प्रमाण वाढल्यामूळे नात्यात विसंवाद निर्माण होत आहेत.  परिणामी समाजात, गावांत, शहरात परस्परात चढत्या भाजणीने विसंवाद वाढत चालला आहे. याचे अदृष्य  परिणाम कुटुंबावर व विशेषत: मुलींवर होत आहेत. दोष एकटीचा नाही, तिला सक्षम बनविण्याबरोबरच पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज आहे.

                 खरी समानता तेव्हा येईल जेव्हा योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात विकसित होईल आणि स्त्री पुरूष समाजाची दोन्ही अंगे गुण्या-गोविंदाने रहातील. अजून बराच मोठा पल्ला गाठावयाचा आहे. इतर अनेक घटकही याला जबाबदार असतात. परिस्थिती, वातावरण, योग्य संधी, मानसिक पाठबळ आणि तिची स्वत:ची बदल घडवून आणण्याची इच्छा !

               आणखी एक, नुसते शिकणे अपेक्षित नसून आर्थिक स्वातंत्र्य आणि मानसिक स्वातंत्र्य जपणे महत्वाचे ठरते. निसर्गाने पाळण्याची दोरी स्त्रिच्या हातात दिल्यामूळे एक जबाबदारी वाढलेली आहे मात्र निर्णय स्वातंत्र्य तिच्या हातात दिलेले नाही.  हा महत्वाचा निर्णय जेव्हा ती स्वता:चा घेऊ शकेल तेव्हा ख-या अर्थाने तिची स्वता:ची समाजाची पर्यायाने देशाची प्रगती होऊ शकेल.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव