आमचे अण्णा

 लग्न ठरल्यावर पहिल्यांदा मैत्रिणींनी व बहिणींनी कौतुकाने सांगितले होते की, सासरी फक्त तुला सास-यांना सांभाळायचे आहे. दुसरे कोणी नाही, मजा आहे बुवा तुझी!

          मनात थोडी धाकधुक होतीच! पण पहिल्याच दिवशी अण्णांनी स्वयंपाकघरात नेऊन मला सगळे व्यवस्थित समजावले त्यामुळे मनातली धाकधुक तर कमी झालीच परंतू दडपणही कमी झाले. तसेही लग्नात पाठवणी करतांना काळजी करणा-या माझ्या आई-वडीलांना तुमच्या मुलीला “मुली सारखे सांभाळीन” असे सांगुन अण्णांनी अर्धे मन जिंकले होते.  ते नाते त्यांनी शेवटपणे सांभाळले.

            15 वर्षाच्या त्यांच्या सहवासात त्यांच्या अनेक पैलूंचे दर्शन घडले. शिस्त, वेळच्या वेळी कामाचा उरक, कोणत्याही कामाला कमीपणा समजायचा नाही, पुरूष-स्त्री भेदभाव न करता सगळी कांमे आली पाहिजेत. ते स्वत: सगळी कामे करत असत. आम्ही दोघे नौकरी निमित्त घराबाहेर असल्याने ते परिश्रमपुर्वक दोन मुलींना वाढवणे, खाणे-पिणे सांभाळणे इत्यादी सर्व गोष्टी आवडीने व काळजीपोटी करायचे.

              मुलींना बरे नसले की स्वत: काळजी करायचे. घरात ते भावंडामध्ये मोठे होते.  माझ्या मुलींना  गावच्या गोष्टी सांगणे, इंग्रजी पेपर वाचन, धार्मिक पुस्तकांचे वाचन इत्यादी गोष्टी नियमीतपणे करीत असत. याशिवाय, शिलाई मशीन दुरुस्त करणे, कपडे शिवणे इत्यादी सर्व गोष्टी ते शेवटपर्यंत करत होते. मला मासे फारसे प्रिय नव्हते त्यामूळे तेवढे जमायचे नाही. मग ते स्वत: येऊन दुरुस्ती सुचवायचे. मांदेली माश्याची आमटी ते अप्रतिमपणे करायचे. त्यांच्या अंतिम क्षणापर्यंत (म्हणजे वय वर्ष 94 पर्यंत) ते कोणावरही अवलंबून नव्हते.  आता लेकी मोठ्या झाल्या, परदेशी गेल्या याचे त्यांना खुप कौतूक वाटले असते. आज जे काही  आम्ही आहोत ते त्यांच्या प्रयत्न व  अशिर्वादामूळे शक्य झाले.


Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव