पिया गये रंगून ..सायोनारा टेलिफून

             दूरध्वनीद्वारे दूर राहणाऱ्या कोणाशीही बोलता येईल.आजकाल भारतातील कुठल्याही खेड्यात किंवा शहरात टेलिफोन खूपच सामान्य झाले आहेत. दूरध्वनी बहुतेक घरे, कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयात स्थापित आहेत. एकमेकांच्या संपर्कात राहाण्याकरता फार फार पुर्वी कबुतराचा किंवा अन्य पक्षांचा वापर व्हायचा (जे आता आपल्याला फक्त चित्रपटात बघायला मिळतं), त्यानंतरच्या काळात घोडयावरून माणसं पाठवली जायची संदेशवहनाकरता. एकमेकांचा आवाज एकमेकांना ऐकु येईल अशी कल्पना जेव्हां प्रत्यक्षात उतरली तेव्हां सामान्यांना तो आश्चर्याचा सुखद धक्का ठरला. ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट ज्यानं प्रत्यक्षात उतरवली त्या वैज्ञानिकाचं नाव आहे अलेक्झांडर ग्रॅहम बेल!

             40-50 वर्षापुर्वीचे शमशाद बेगमचे हे गाणे मला खूप आवडते. त्यावेळी टेलिफोन होते का किंवा  सगळ्यांकडे नसावेत.  कुतुहल, आश्चर्य आणि आनंदमिश्रित या टेलिफोनचा उपयोग जेव्हा PCO पर्यंत पसरत गेला तेव्हा त्याचे महत्व खूप वाटायचे. टेलिफोन एक विश्वासू नोकरासारखा होता. त्यावेळी टेलिफोन  हे श्रीमंतीचे  लक्षण किंवा स्टेटस सिम्बॉल वाटायचे. जेव्हा 28 वर्षापूर्वी माझ्याकडे फोन आला तेव्हा कोण कौतूक वाटले होते. तेव्हा मोठी मुलगी बोलायला शिकली होती त्यामूळे तिला त्याच्यावर बोलायला मजा वाटत होती.  आता डिसेबर -2021 मध्ये दुरध्वनीला टाटा केला तेव्हा खूप वाईट वाटले.

                अनेक चांगल्या -वाईट बातमीचा मन मोकळे करण्याचा, विस्तृत बोलण्याचा एक साक्षिदार आपल्यातून गेला असे वाटले. तसेही नौकरीवाल्या बायकांना,ग्रहिणींना टेलीफोनचा मोठा आधार वाटतो कारण विसरणे, आठवण करणे, ख्याली-खुषाली विचारणे अशा अनेक गोष्टी  यावरून सहज केल्या जात होत्या.  मोबाईल आल्यानंतर काही वर्ष याची चलती होती. सरकारी उपक्रमाचे कालांतराने अवमुल्यन होते तसेच या कंपन्यांचे झाले.  खाजकीकरण आणि “कर लो दुनिया मुठ्ठीमे”या वृत्तीमुळे MTNLच्या कर्मचा-यांचे आणि राष्ट्रीय संपत्तीचे दुसरीकडे विलीनीकरण करणे किंवा बंद करणे या शिवाय पर्याय शिल्लक नसतो. तरी शासकीय कार्यालयात अजून MTNL टेलीफोनला थोडीफार धूगधूगी आहे. डायल असणा-या फोनपासून ते प्रेस बटन, काळ्या पांढ-या फोनपासून ते रंगीत छोट्या बॉक्स पर्यंतची टेलिफोनची प्रगती उल्लेखनिय होती.

              कर्मचा-यांची अनास्था, सेवेतील कमतरता आणि अनुत्पादकता या निकषांवर कोणतेही सार्वजनिक उद्योग टिकाव धरु शकत नाहीत. त्यासाठी लागणारे मानसिक पाठबळ आणि राजकीय हेतू पणास लावले जातात. परिणामी एक चांगली सेवा बंद पडून सर्वसामान्य माणूस भरडला जातो आणि कनेक्शन बंद करण्याशिवाय पर्याय रहात नाही.

                   कार्यालयात आपआपसात संवाद साधण्यासाठी, लांबंच्या लोकांची खुषाली विचारण्यासाठी, परराज्यात, परप्रांतात व्यापारी संबंध टिकविण्यासाठी, वैयक्तिक दुखणी-खुपणी कळविण्याचे एकमेव खात्रीचे, माहितीचे, दळणवळणाचे टेलिफोन हे एक साधन होते. त्यासाठी लागणारा खर्चही तुलनात्मकरित्या कमीच होता. प्रतिक्षायादी खुप असल्याने टेलिफोन लगेच मिळत नसे  मात्र वारंवार क्रोस कनेक्शन लागणे, टेलिफोन बंद पडणे, टेलिफोनच्या मोठे-मोठे पिवळी पुस्तके (खंड) मिळायचे त्यात बारीक अक्षरात असलेला नंबर शोधून काढणे हा एक उद्योग असायचा. आकस्मिक परिस्थितीत  टेलिफोनचा उपयोग व्हायचा. अजूनही मोबाईल नेटवर्क नसेल तर घरगुती टेलिफोन उपयोगाला येतो.

               अशा या बहुपयोगी यंत्राचे महत्व कमी होत जाऊन त्याची जागा मोबाईलने घेतली. जागतिकीकरणामूळे ब-याच जुन्या गोष्टी नामशेष होवू लागल्या त्यातली ही एक.  पाढंरा हत्ती पोसायचा की त्याचे विसर्जन करायचे हा एक मोठा भावनिक प्रश्न आहे.  बहूउपयोगी मोबाईलमूळे  माणसाचा थांगपत्ता लागेल असे वाटत असले तरी नेहमी लागतोच असे नाही.

                      अशा या टेलिफोनला माझा सायोनारा.





Comments

  1. मस्त लिहिलंय !
    मोबाईल पेक्षा मला अजूनही लँडलाईन जवळचा वाटतो . पण हल्ली कोणाकडे नसतोच . तरी मी ठेवलाय अजून 🥰

    ReplyDelete
  2. आम्ही अजून ठेवलाय टेलीफोन पण त्याचा उपयोग फक्त ब्रॉडबँडसाठी.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव