लोकमान्य (सन 1856 ते 1920)

             सध्याची झी टिव्हीवरील माझी सगळ्यात आवडती आणि लोकप्रिय अशी मालिका म्हणजे “लोकमान्य” म्हणता येईल. चांगले काम, कलाकार आणि आपला इतिहासातील “एक बाणेदार व्यक्तिमत्व आणि तेवढ्याच खंबीरपणे साथ देणारी लोकमान्यांची पत्नी” असे एकूण वर्णन मालिकेचे करता येईल.  या मालिकेत ( शिवजयंती, गणेशोत्सव सुरु केले, गीतारहस्य लिहीले ...) असे आणखीन बरेच मुद्दे स्पर्ष करायचे राहून गेले असे वाटते. अर्थात त्यांच्या कार्याचा सगळा आढावा ठरावीक एपिसोड मध्ये घेणे शक्य नसले तरी हे आवश्यक होते असे माझे मत आहे. 

             शाळेत असतांना हमखास लोकमान्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाषण, वकृत्व, वेशभूषा स्पर्धा भरविल्या जात असत. तेवढीच त्यांची आठवण जागवली जायची. टिळक गणित व खगोलशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. ते एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याला स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि बहि:ष्कार या चतु:सुत्रीची देणगी दिली हे सगळे विसरतात.  टिळकांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने इ.स. १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी “केसरी” हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर “मराठा” हे इंग्रजीमधून. लोकमान्य  टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे आद्य नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना "भारतीय असंतोषाचे जनक" असे म्हटले होते.  त्यांना "लोकमान्य" ही पदवी देखील बहाल करण्यात आली, ज्याचा अर्थ "लोकांनी त्यांचा (नेता म्हणून) स्वीकार केला" असा होतो. महात्मा गांधींनी त्यांना "आधुनिक भारताचा निर्माता" म्हटले होते.  टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" या त्यांच्या घोषणेसाठी ते ओळखले जातात.  टिळकांचा समावेश त्याकाळच्या प्रसिध्द त्रिमुर्तीमध्ये केला जात असे. (ते म्हणजे  आणि लाला लजपत राय हे लाल, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक  आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल) लोकमान्यांनी मंडाले, ब्रम्हदेश येथे तुरूंगवास भोगला. स्वत: वकील असूनही त्यांनी देशहीत लक्षात घेऊन त्यांची वकीली “स्वराज्य” वृत्तपत्रातून केली. वास्तविक आरामात सरकारी नोकरी करुन मजेत राहू शकले असते. लोकमान्य त्यांच्या काळात कॉंग्रेसचे देश पातळीवरील सर्वात महत्वाचे नेते होते. हल्ली, whatsaapvar, fb वरr त्यांचे विचार, भाषणाचा उल्लेख केला जातो. एकाने यावेळी मात्र आता तुम्ही हवे होतात” असे लिहीले होते, त्यावरुन ते कालातीत वागत होते,  लिहित होते याची प्रचीती आली. खरेच असे जहाल, खरमरीत लिहिणारे, सरकारला (परकिय) जाब विचारणारे सुनावणारे ना वृत्तपत्रे राहिलीत ना व्यक्तीमत्वे! स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवून केवळ देशहीत जपणे हेच ध्येय बाळगले आणि पत्नीनेही तेवढीच समर्थपणे साथ दिली. स्वातंत्र्याचे महत्व जनमानसास पटवून देणे, त्यासाठी जनमत तयार करणे, प्रसंगी स्वत:च्या खिशाला खार स्विकारणे, स्वराज्य आधी मिळाले पाहिजे नंतर सामाजिक सुधारणा होत रहातील असे त्यांचे मत होते. त्यांनी शाळा व कॉलेज सुरु केली. अनेक त्याग त्यांनी आपल्यासाठी केलेत पण आपण त्यांची जाणीव ठेवतो का? उलट आजची परिस्थिती बघून त्यांना वाईटच वाटेल अशी काळजी वाटते. नुसती जयंती आणि पुण्यतिथी साजरी करुन काय होणार? त्यांचे विचार, कृती आजही तेवढिच महत्वाची आहे आणि कृतित आणली गेली पाहिजे. तसा नुसता प्रयत्न केला तरी आपण कुठल्या कुठे जाऊ!

          एक काळ असा होता की, अर्धा लिटर दुधाचे 10 पैसे वाढले तरी लोक रस्त्यावर उतरत (महागाईला विरोध म्हणून) आज कितीही महागाई वाढली तरी लोकांना काहीच पडलेले नाही असे वाटते. देशात कोणी गरीब राहिलेच नाहीत की काय असे कधी कधी वाटते. निदान त्याची जाणिव असणारे तरी आहेत का? फक्त माणसाचा जीव तेवढा स्वस्त झाला आहे असे खेदाने म्हणावे लागते. सगळ्यात दुर्दैव आपले हे की, कोणी तु चुकतो आहेस हे म्हणणारे / सांगणारे कमी झालेत / किंवा आवाज दाबला जातोय. विरोध नाही म्हटल्यावर मग काय मनमानी चालणारच ना! सत्तेतसुद्धा विरोध नावालाच केला जातो. काही काळाने विरोध करणारेच सत्तेवर आल्यावर त्याचेच समर्थन करायला लागतात. अनेक योजना विरोधामूळे बारगळतात आणि नवीन स्वरुपात पुन्हा कुणीतरी त्याची भलामण करते आणि ती विनाशर्त स्विकारली जाते. याला अपवाद ना शिक्षक ना आई-वडिल ना समाजसुधारक ! मग देशाची प्रगती होणार कशी आणि कधी? भौतिक समृद्धी खुप होतेय पण शांती, समाधान आणि स्थैर्याचे काय!

        लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वृत्तपत्राला दिलेली मान्यता तरी प्रामाणिकपणे बजावतात का? लोकांचा आवाज समजुन कोणत्याही अनिष्ट चालीरिती, सरकारच्या वागणुकीवर ताशेरे ओढणारे वृत्तपत्रे कोणतीही बातमी फक्त प्रसिध्दीसाठीच आणि ठराविक दृष्टीकोन बाळगूनच दिली जाते असे वाटते. तटस्थता किंवा सामाजिक बांधिलकीचा कुठेही लवलेश आढळून येत नाही. विशीष्ट पक्षाला, उद्योगसमुहाला वाहून घेतलेली ही वृत्तपत्रे नुसता बातम्यांचा भडिमार करीत असतात. एकच बातमी 24 तास सर्व वाहिन्यांवर दाखवली जात असते. त्यात गुन्हा, अपघात, धर्माबाबतची चांगली बातमी, वाईट बातमी असा कोणताही फरक नसतो. आपणच बातमी कशी पहिल्यांदा कवर केली याची मात्र पुरेपुर काळजी घेतली जाते. सतत डोक्यावर बातम्या मारुन काय समाधान मिळते माहित नाही. त्यामूळे कालांतराने डोके बधीर होऊन बथ्थड होऊन बरे काय वाईट काय कळेनासे होते.  आमच्यासारखे काहीजण फक्त राष्ट्रीय स्तरावरच्याच बातम्या (ज्या संयमीत स्वरुपात दाखविल्या जातात) त्याच बघतो.

        लोकमान्य ही पदवी त्यांना उगीच मिळालेली नाही. लोकांनी स्वत:हून दिलेली, देऊ केलेली ही नुसती पदवी नसून त्यासाठी त्यांनी केलेले परखड लेखन, अभ्यास, घेतलेले कष्ट, घर-परिवाराचा  त्याग, तुरुंगवास आणि समाजसेवा महत्वाची ठरते. आज आपण काय बघतो,सत्तेसाठी काहीही, पैशासाठी काहीही अशी आपली धारणा बदलत आहे, त्यांना त्यांचे काय वाटणार? दिवसेंदिवस आपली प्रगती होते की, अधोगती असे कधी कधी वाटते. त्याला जबाबदार कोण असे प्रश्न पडतात. आपण सगळेच थोड्याफार प्रमाणात जबाबदार आहोत. दुरचा विचार करायचा कोणी? हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरतो. मुख्य म्हणजे ज्या तरुणांनी हे समजुन घ्यायचे ते परदेशी जाण्यात उत्सुक आहेत, जे आहेत त्यांना एवढा विचार करायला वेळ नाही. त्यासाठीच असे म्हणावेसे वाटते की, सार्वजनिक उत्सवातुन सामाजिक एकात्मतेची जाणिव करुन देणारी स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार, थोर समाजसेवक टिळकांना आमचे त्रिवार अभिवादन! तेव्हाही होतीच पण आज आपल्याच राज्यातही तुमची खरी गरज आहे.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव