माझी/आमची आध्यात्मिक वारी-भाग-2

 

            मागच्या वर्षी भाग-1 मध्ये गिरनार, द्वारका आणि सोमनाथ अशी त्रिस्थळी यात्रेचे वर्णन आपण सगळ्यांनी वाचले असेलच. आता यावेळि आमची अचानकच 3 वेळा 3 ठिकाणे अध्यात्मिक यात्रेची झाली. पहिले ठिकाण ओक्टोबर-मध्ये गोवा-म्हार्दोळ,कुलदेवतेला मूलिसकट झाली. यांचा 60 वर्ष पुर्ण आणि मुलिचे लग्नानिमित्त अशी 3 दिवस ही यात्रा नेहमीच माहेरपणासारखी वाटते. राहणे,खाणे, फिरणे आणि येऊन झोपणे एवढेच काम. उरलेल्या वेळात देवीचा उत्सव, आरती आणि भजन वगैरे असतेच. एकुणच वातावरण आल्हाददायक आणि भक्तीमय असल्यामुळे खुप छान वाटते. त्यात लेकिने साडी,मी नववारी आणि यानी पितांबर नेसले होते,तिही हौस पुर्ण झाली. आधी ठरवुन गेल्यामुळे व्यवस्थित राहणे आणि दर्शन व पालखी बघावयास मिळाली.

             दुसरे पाहुण्यांमुळे शिर्डिला जाण्याचा योग अचानकच आला. 2 दिवसात शिर्डी, शनी शिंगणापुर व परत असे धावता दौरा करावा लागला. 20-22 वर्षांनी गेल्यामुळे सगळे एकदम  वेगळेच वाटत होते. बहुमजली धर्मशाळा आणि मोठा मंदिर परिसर,सगळीकडे नुसती गर्दी,रांगा, व्यापारीकरण. तरी शांतपणे आम्हाला अभिषेक करायला मिळाला व रांगेत उभे राहुन व्यवस्थीत दर्शन झाले हे विशेष. ट्रेन न मिळाल्यामुळे बसने जाऊन येऊन जरा त्रास झाला पण ठिक आहे. तेवढे कष्ट तरी देवासाठी घेतले पाहिजेतच ना!

               तिसरे म्हणजे महिला टुर शेगाव, कारंजा आणि माहुर येथे 2 दिवसांची अचानकच मैत्रिणींमुळे जाण्याचा योग आला. वास्तविक माहुरला शाळेत असताना नांदेडला वर्षातुन एकदा तरी सहल निघायची पण मला जायला मिळायचे नाही. तो योग एवढ्या 40-42 वर्षांनी आला हे नवल. पहिलीच एकटीने सहल केली त्यामुळे जरा टेन्शन होते पण सोबत 23 जण महिला होत्या आणि सगळा व्यवस्थित कार्यक्रम आखलेला होता, त्यामुळे काही त्रास झाला नाही हे विशेष.  शेगावचे विशेष कौतुक म्हणजे एकतर सगळ्यांना“माऊली” म्हणुन हाक मारणे, शिवाय कुठेही बेशिस्त गडबड,गोंधळ नाही कि तिथे हार,फुले काहीही नेणे आणणे नाही. 42 प्रकारच्या सेवा या संस्थेमार्फत दिल्या जातात. सगळेजण फक्त सेवा म्हणुनच काम करतात. त्यासाठीसुद्धा 2-3 वर्षे थांबावे लागते आपला नंबर येईपर्यंत. रांगेत उभे राहिल्यावर किती वेळ लागेल याचा अचुक अंदाज बघुन आश्चर्य वाटले.करोनाच्या काळापासुन द्त्तात्रयांच्या मंदिरात जाण्याचा योग आला नव्हता तो कारंजा येथे आला. येथे अनायसे जेवणाचा प्रसाद व आरती मिळाली.

              तसेही आध्यात्मिक वारी करणे हे केवळ संसार/प्रपंचातुन थोडा वेळ स्वत:साठी, आपल्या मानसिक समाधान व शांतीसाठी घालवायचा असतो. शाळा, कोलेजची, कार्यालयातुन मुद्दाम दर्षेनासाठी येणा-या मुला-मुलींचे कौतुक वाटले.  यामागे असणारी संतांबद्दल, देवाबद्दलची ओढ, भक्ती म्हणावी की दिखावा वा एक कर्तव्य म्हणावे? हा मलाही प्रश्न पडला. दत्तात्रयाचा जन्म कसा झाला? हे विचारणारी मध्यमवयीन महिला बघुन आश्चर्य वाटले. सहसा आपण जिथे जातो तिथली माहीती जर नसेल तर जाऊन काय उपयोग? कुणाला तरी सोबत म्हणुन, संसारातुन विरंगुळा म्हणुन की फिरायला आम्ही कसे जातो? याचे  प्रदर्शन याचा ठाव लागला नाही.

               एकीकडे कोणताही देव, धर्म न मानणारी पिढी हीच का ती? चंगळवाद, भौतिक सुखाने ओसंडुन वाहणारी हिच का ती ? असाही प्रश्न पडतो मला. पुर्वी आध्यात्मिक वारी तर पायी, कोणतेही बाहेरचे अन्न न खाता केली जात असे. आता तर आपण सगळीकडेच आगाऊ नोंद करुन पंचतारांकीत सोयी बघुन जातो. तसेच रांग लावायलाही नको म्हणुन आगाऊ पैसे भरुन, ओळख काढुन देवाकडे वशीला लावतो. हे खरेच मनाला पटते का? थोडा संयम, वाट नको का बघायला? वेळेचे बंधन तर कोणतेही स्थळ शांततेने बघायला मिळत नाही. मग या वारिचे फलित एवढेच कि, देवाकडुन/देवीकडुन संतांकडुन काही कामे करवुन घेणे,झाल्यावर जर नवस केला असेल तर तो फेडणे. काहीतरी समस्या,अडचण असल्यास त्याबद्दलचे साकडे घालणे, नवस बोलणे अशा अनेक कारणांनी लोक कायम सगळिकडे जात असतात. प्रत्येकाचा भाव वेगळा तसा देवही वेगळा. श्रद्धा नक्किच असावी पण आंधळी नसावी इतकेच महत्वाचे.  अगदी म्हातारी माणसे चालायला होत नसणारी बघुन त्यांच्या जिद्दीचे कौतुक वाटले.  

              शेगांव, शिर्डीची वारी पायी चालत (नियमितपणे) करणारे,पालखी घेऊन जाणारे असेही अनेकजण बघितले.  मी मात्र जे मिळाले त्याबद्दल “धन्यवाद” व जे “योग्य असेल ते नक्किच मिळेल”या विश्वासाने अशा ठिकाणी जात असते. याशिवाय मानसिक समाधान, शांती आवश्यक असतेच त्यासाठी जाणे गरजेचे वाटते. याचा कोणीही गैरफायदा मात्र नक्किच घेऊ नये असे मनापासुन वाटते. हा पैसा खरेच टिकत असेल का? असेही कधी कधी वाटते. विज्ञानयुगात वावरणारे आपण अध्यात्माची जोड मिळाल्यास नक्किच समृद्धी टिकेल. विज्ञान आणि अध्यात्माची सुरेख सांगड याबद्दलची सुंदर वचने शेगांवला वाचायला मिळाली.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव